रत्नागिरी:- शहरातील नवीन पाणी योजनेची पाईप लाईन सोमवारी करण्यात आलेल्या हायड्रोलिक टेस्टींगमध्ये यशस्वी ठरली नाही. टेस्टींग सुरु असताना बांधकाम विभागासमोर ही पाईप लाईन पुन्हा फुटली. त्यामुळे नगर पालिकेकडून याबाबतचा अहवाल जीवन प्राधिकरणकडे पाठवण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहरासाठी सुमारे 63 कोटी रुपये खर्च करुन नवीन नळपाणी योजना राबवण्यात आली. ही नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. मात्र ही योजना सुरु झाल्यापासून पाण्याच्या दबावाने ती सातत्याने फुटत आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे या पाणी योजनेचे हायड्रोलिक टेस्टींग व्हावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पण नुकताच या योजनेचे हायड्रोलिक टेस्टींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. टेस्टींग सुरु झाल्यानंतर चौवीस तास त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याने जेल नाका ते गोडीबाव हा सुमारे एक किलोमीटर पाईप लाईनचा परिसर निवड आला होता. याच भागात वारंवार पाईप लाईन फुटण्याचे प्रकार घडले होते.
सोमवारी सकाळी हायड्रोलिक टेस्टींग करण्यात आले. यासाठी पाईपलाईनचे प्रेशर तपासण्यात आले. त्यानंतर प्रेशर वाढवून तपासणी करण्यात आली त्यात बांधकाम विभागासमोर पाईप लाईन फुटली. यावेळी ठेकेदार कंपनीचे अधिकारी, नगर परिषद अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या भागातील हायड्रोलिक टेस्टींगचा अहवाल जीवन प्राधिकरणाकडे पाठविला जाणार आहे.
याबाबत माहिती देताना जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले की, रत्नागिरीतील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात आलेले पाईप हे कोल्हापूर येथील डेल्टा पाईप कंपनीचे आहेत. एसजीएस इंडिया कंपनीने केलेल्या थर्डपार्टी ऑडीट नंतर या पाईपला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे उत्तम पाईपच वापरण्यात आले आहेत. नवीन नळपाणी योजनेसाठी टप्प्याटप्प्याने एकएक किमीचे हायड्रोलिक टेस्टींग करण्यात येणार आहेत. संपूर्ण पाईप लाईन विषयी शंका असतील तर ती पूर्ण बदलण्याचा विचार केला जाईल, असेही या अधिकार्यांनी स्पष्ट केले.