रत्नागिरी:- जिल्ह्यात वेगवान वारा आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून, मासेमारीत विघ्न आले आहे. हंगामाच्या आरंभीला मच्छीमारांना फटका बसला आहे. पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे जाळी मारणेही अशक्य झाले आहे. नौका पाण्यात उभ्या करणे शक्य नाही. त्यामुळे नौकांनी भगवतीबंदर येथे सुरक्षेसाठी आसरा घेतला आहे.
जून, जुलै हे दोन महिन्यात मासेमारीला शासनाच्या निर्देशानुसार बंदी केली जाते. १ ऑगस्टला बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील वीस टक्के मच्छीमार समुद्रावर स्वार झाले. समुद्रही शांत असल्याने वातावरण मासेमारीला पूरक होते. ट्रॉलिंगवाल्यांनी खोल समुद्राकडे नौका जाऊ लागल्या. १ रोजी गेलेल्या नौका दोन दिवसांनी हर्णै बंदरात आल्या तर त्यानंतर पुन्हा मासेमारीला रवाना झालेल्या नौकांना वारा, पावसाने गाठले. खोल समुद्रातील वातावरण बिघडल्यामुळे सुरक्षिततेसाठी नौकांनी जयगड, भगवतीसह जवळच्या बंदरात नांगर टाकला. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. वार्यामुळे लाटा उसळल्या असून या परिस्थितीत जाळ्यांचे रोप तुटण्याची भिती असते. जाळं वाहून जाते किंवा लाटांच्या तडाख्याने जाळी तुटतात. हे नुकसान मच्छीमारांना सहन करावे लागते. यासाठी मच्छीमार या परिस्थितीमध्ये नौका बंदरात उभ्या करणे पसंत करतात. जिल्ह्यात ट्रॉलिंग, गिलनेटसह पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या 3 हजाराहून अधिक नौका आहेत. त्यासाठी सहाशेहून अधिक नौकांनी मासेमारीला सुरवात केली. श्रावण महिन्यात धार्मिक सप्ताह असल्याने काहींनी शुक्रवारचा मुहूर्त साधला होता; पण वातावरण बिघडल्यामुळे त्यांना मुहूर्त पुढे ढकलावा लागला आहे. काही नौका सोमवारनंतरच रवाना होणार आहेत. हवामान विभागाकडून चार दिवसांचा अलर्ट दिला आहे. खराब वातावरणाचा फटका मच्छीमारांना पहिल्या आठवड्यात बसला आहे. सुरवातीला गिलनेटला बांगडा, ट्रॉलिंगला चिंगळं आणि म्हाकुळ मासा मिळत होता.