‘शिवछत्रपती’ पुरस्कारासाठी आरती कांबळे, अपेक्षा सुतारचे मानांकन

एकाच वेळी रत्नागिरीच्या दोघींची निवड; पालकमंत्र्यांकडून कौतूक

रत्नागिरी:- राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ठ , आंतराष्ट्रीय खो-खोपटू कु. आरती अनंत कांबळे, कु. अपेक्षा अनिल सुतार यांची राज्य निवड समितीने नामांकने जाहिर केली आहे. लवकरच राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मात्र एकाच वेळी खो-खोच्या दोन खेळांडूना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळण्याची हि पहिलीच वेळ आहे. दोघीना मिळणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामुळे रत्नागिरीची मान अधिकच उंचावली आहे.

महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत करणाऱ्यांचा महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यातून विविध प्रकारच्या खेळांमध्ये सातत्याने चमकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करणे आणि नवोदित, होतकरू खेळाडूंना उत्तेजन देणे हा उद्देश आहे.
सन 201920 वर्षासाठी खो-खोपटू आरती अनंत कांबळे हिची तर सन 2021-22 या वर्षासाठी अपेक्षा अनिल सुतार हिच्या नावाचे नामांकन राज्य निवड समितीने केले आहे. दि. 22 मे नंतर राज्य शासानाच्या क्रीडा विभागामार्फत पुरस्कारांची अधिकृत घोषणार करण्यात येणार आहे.रत्नागिरीतील रा.भा. शिर्के प्रशालेच्या दोन्ही विद्यार्थींनी असून यापुर्वी शिर्के प्रशालेच्याच ऐश्वर्या यशवंत सावंत हिलाही खो-खोतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे.आता दोघींचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन झ्ााल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे.

रत्नागिरीतील रा.भा.शिर्के प्रशालेत माध्यमिक शिक्षण घेत असताना आरती कांबळे हिने इयत्ता सातवीपासून खोखो खेळाला सुरुवात केली. शालेय स्पर्धातून सहभाग नोंदवत तीने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकदार पद्धतीने खो-खो खेळून जिल्ह्याचे नाव देशभारत पोहचविले आहे. खेळासोबतच एमए झालेल्या आरतीने आतापर्यंत सुमारे 60 ते 70 विविध स्पर्धांच्या माध्यमातून खोखो खेळात चमकदार कामगिरी केली आहे. तर तब्बल सहा राष्ट्रीय खो-खो स्पर्धांमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर 4 फेडरेशन चषक स्पर्धेमध्येही तीने चमकदार कामगिरी केली आहे.

अपेक्षा सुतार हिचेही माध्यमिक शिक्षण रा. भा.शिर्के प्रशालेतूनच पुर्ण झाले आहे.पदविधर असलेल्या अपेक्षा सुतार हिने 4 थ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय खो-खो संघात प्रतिनिधित्व केले होते. तर नेपाळ काटमांडू येथे झालेल्या 13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. शालेय स्तरापासून सुमारे 50 ते 60 विविध स्पर्धांच्या माध्यमातून अपेक्षाने विविध पारितोषिक पटकाविली आहे. तर नुकताच तिने मानाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकाविला होता. चार राष्ट्रीय खो-खो स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासोबतच अपेक्षाने तीन फेडरेशन चषक स्पर्धेमधून उत्तम खेळ केला होता.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन झाल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत, रत्नसिंधू योजना समितीचे सदस्य प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत, जिल्हा खो-खो असो.चे अध्यक्ष दत्तात्रेय उर्फ बाळू साळवी यांनी आरती कांबळे, अपेक्षा सुतार यांचे अभिनंद केलेे आहे.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू
घडविणारे कोकणातील एकमेव प्रशिक्षक
आरती कांबळे, अपेक्षा सुतार यांना घडविण्यात राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे खूप मोठे योगदान आहे. स्वत: राष्ट्रीय खेळाडू असलेल्या पंकज चंवडे यांनी गेले 22 वर्ष रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर अनेक खो-खो खेळाडू घडविले आहेत. त्यातील ऐश्वर्या सावंत हिच्या रुपाने पहिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला होता.आता एकाच वेळी दोन खेळाडूंचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मानांकन झाले आहे. तीन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू घडविणारे पंकज चंवडे कोकणातील एकमेव प्रशिक्षक आहेत.तर शाळेतील शिक्षक विनोद मयेकर,संदीप तावडे यांचे दोघींना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

अचूक मार्गदर्शनामुळे इथपर्यंत पोहचले: अपेक्षा सुतार
लहान पणापासून खेळाची आवड होती. शिर्के प्रशालेत शिक्षण घेत असताना शालेय स्पर्धेतून खो-खो खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे सर यांचे अचूक मार्गर्शन मिळत होते. न चूकता मैदानात सकाळ, संध्याकाळ सराव करणे, खेळासोबतच फिटनेसकडे लक्ष देणे, खेळातील बारकावे, शोधून स्वत: मधे बदल घडवून आणले. त्यातूनच हे यश मिळत आहे. या यशामध्ये माझे आई-वडिल, प्रशिक्षक पंकज चवंडे सर, विनोद मयेकर सर, नातेवाईक , सहकारी खेळाडू यांचा सिंहाचा वाटा असल्याचे अपेक्षा सुतार हिने सांगितले.

पंकज चवंडे सरांंनी घडविले: आरती कांबळे
शाळेतून खो-खो स्पर्धा खेळत होते. इयत्ता सातवीमध्ये असताना खेळायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे सर यांच्या क्लबमधून खेळायला सुरुवात केली. सरांनी शिस्तीसोबतच खेळातील बारकावे समजून सांगितले. त्यांचे नियमित असलेले अचूक मार्गदर्शन यामुळे आम्ही चांगला खेळ करु शकलो.आज आमचे पुरस्कारासाठी नामांकन झाले असले तरी खो-खो हा सांघिक खेळ आहे. सहकारी खेळाडूही माझ्यासाठी महत्वाचे आहेत. आई-वडिलसह पंकज चवंडे, विनोद मयेकर, संदिप तावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आरती कांबळे हिने सांगितले.