डॉ. भास्कर पाटील; नोंदणीसाठी ६ पासुन सुरुवात
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. यंदाच्या हंगामात आंबा विक्रीकरीता पुण्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यात आणि परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी ६ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली.
स्टॉल नोंदणी करीता आंबा नोंदीसह मागिल ६ महिने कालावधीतील सातबारा उतारा, आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणा-या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, भौगोलीक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, पणन मंडळाचे नावे १० हजार रूपये अनामत रक्कमेचा धनादेश अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र अशी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. इच्छूक आंबा बागायतदारांनी पणन मंडळाच्या विभागिय कार्यालयात किंवा कृषि व्यवसाय पणन तज्ञ कपिल खामकर यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठीचे अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. दरम्यान, पणन मार्फत दिल्या जाणाऱ्या या स्टॉलचा उपयोग करून रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार यांनी चांगला लाभ घेतला आहे. दरवर्षी सुमारे शंभरहुन अधिक बागायतदारांना फायदा झाला आहे.