रत्नागिरी:- तालुक्यात कोरोनाने कहर केलेला असला तरी 42 गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गावाला कोरोनामुक्त कसे ठेवता येईल, यासाठी ग्रामपंचायतींचे ग्रामस्थांच्या सहकार्याचे सततचे प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी तालुक्यात कोरोना प्रादुर्भावामुळे तालुकावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. पहिले तीन महिने रुग्ण मर्यादित संख्येत सापडत होते. मात्र जुलै, ऑगस्टपासून कोरोनाचा कहर वाढू लागला. गणेशोत्सवात कोरोनाने कहरच केला. त्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. तेव्हापासून रुग्णसंख्या कमी आणि पण सातत्यपूर्ण होती. मात्र शिमगोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे येथील चाकरमानी रत्नागिरी तालुक्यात आले होते. याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच शासनाचे कोविड नियम, अटींचे पालनही लोकांकडून केले जात नसल्याने कडक निर्बंध करण्याची वेळ आली. तालुक्यामध्ये आतापर्यंत 3,266 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2941 रुग्ण बरे झाले तर 231 रुग्ण क्टिव्ह असून, 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात एकूण 201 गावे असून, 3,19,449 लोकसंख्या आहे. त्यापैकी 159 गावापर्यंत कोरोनाने मजल मारली आहे, तर अजूनही 42 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. या गावाच्या ग्रामपंचायतींकडून कोविड नियम, अटींची काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवले जाते. मास्क आणि सॅनिटायरचा वापर केला जात आहे.
तरवळ, मायंगडेवाडी, माचिवलेवाडी, आगरनरळ, बोंड्ये, कपिलवस्तू, कळझोंडी, रिळ, काजीरभाटी, जमातवाडी, गुंबद, पन्हळी, सत्कोंडी, कचरे, सांडेलावगण, वैद्यलावगण, सरफरेवाडी, कोंड, वळके, वळके मराठवाडी, चरवेली, नागलेवाडी, कोठारवाडी (चरवेली), पाथरट, कोंडखंडकर, बागपाटोळे, वाडाजून, भोळेगाव, डांगेवाडी, ठिकाणदाते, मधलीवाडी (फणसवळे), नातुंडे, डोर्ले, शिवारआंबेरे, गावखडी मोहल्ला, जांभूळआड, तळीवाडी, धोपटवाडी, नालेवठार, ठिकाण चक्रदेव, ठिकाण सोमण, ठिकाण बेहरे या गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.