रत्नागिरी:- विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाच्या पदाधिकार्यांनी सोमवारी रत्नागिरीत लाक्षणिक संप केला.
राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून त्यासाठी तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. आकृतीबंधात सुधारणाबाबत दांगट समितीने प्रसिध्द केलेला अहवालानुसार पदे मंजूर करण्यात यावीत. यासह जवळपास 15हून अधिक मागण्यांचे पत्र महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारी मुख्यमंत्र्यांसह, महसूलमंत्री व मुख्य सचिवांना दिले. मंत्रालयासह प्रत्येक जिल्ह्यात व विभागात कर्मचार्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. यानंतरही राज्य शासनाने विचार केला नाही तर दि. 4 एप्रिलपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील महापुरुष मंदिरात लाक्षणिक संप करण्यात आला. यावेळी संघटनेचे सुनील कीर, अभिजीत शेट्ये यांच्यासह मुख्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.