कवी केशवसुतांचे मालगुंड गाव ; भाषा विकास विभागाकडून पाहणी
रत्नागिरी:- ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासीयांचे सहा वर्षांपूर्वीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तत्वतः मंजुरी मिळालेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून कोकण मराठी साहित्य परिषदेने सातत्याने याचा पाठपुरावा केला आहे. चार महिन्यांपूर्वी भाषा विभागाच्या अधिकार्यांनी मालगुंडला भेट देऊन पुस्तकांसाठीची ठिकाणेही निश्चित केली आहेत.
ग्रंथालय दिनानिमित्त वाचन चळवळीला उपयुक्त ठरणार्या उपक्रमांना राज्य शासनाकडून चालना दिली जात आहे. पुस्तकांचे गाव हा एक त्यातील उपक्रम आहे. वर्षांपूर्वी मंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईतील कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तो उचलून धरला. त्यामुळे कोमसापच्या प्रयत्नांना बळ मिळाले. कोरोनाच्या परिस्थितीतही कोमसापचे संस्थापक विश्वस्त मधु मंगेश कर्णिक आणि कार्यकारी विश्वस्त रमेश कीर यांनी मंत्री देसाईंची भेट घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. केशवसुतांच्या मालगुंडचा प्रस्तावाला त्यांनी तत्वतः मंजुरीही दिली. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये भाषा विकास मंत्रालयाची एक समिती मालगुंडला आली होती. त्यावेळी केशवसुत स्मारकांमध्ये कोमसाप पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. प्राथमिक चाचपणीत ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकार्यांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.
प्रत्यक्ष भेटीवेळी भाषा विभागाच्या अधिकार्यांनी मालगुंड गावांमध्ये किती ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल ठेवता येथील याची पाहणी केली. यामध्ये गावातील शाळा, ग्रामस्थांची घरे, हॉटेल्स यासह केशवसुत स्मारक ग्रंथालयासह सुमारे सोळा जणांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी ग्रंथालयाप्रमाणे रचना केली जाणार असून पुस्तक ठेवण्यासाठी दोन मोठे स्टँण्ड, बसण्यासाठी खुर्ची-टेबल ठेवले जाईल. संबंधित ठिकाणी प्रवेशद्वारावर पुस्तकांचे गाव म्हणून पाटीही लावली जाईल. आवडीची पुस्तके वाचण्याबरोबरच त्याच्या विक्रीचीही व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये कादंबरी, कथा, कवितांचे दालन, चरित्रग्रंथ यासह वेगवेगळी पुस्तके मालगुंडमध्ये ठेवण्यात येणार आहे. या निमित्ताने वाचन संस्कृतीला चालना मिळणार असून पर्यटनवाढीलाही मदत होऊ शकते. गणपतीपुळेत दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात. त्यातील वाचन संस्कृतीशी निगडित पर्यटक मालगुंड वळू शकतो. निसर्गाच्या सान्निध्यात वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.
कवी केशवसुतांचे मालगुंड पुस्तकांचे गाव बनवण्यासाठी मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे कोमसाप पाठपुरावा करत आहे. चार महिन्यापूर्वी भाषा विकास विभागाकडून पाहणी झाली. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला मूर्त स्वरूप येईल.
– गजानन पाटील, अध्यक्ष, केशवसुत स्मारक समिती