गोवंशाचे शीर आढळल्या प्रकरणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह सकल हिंदू समाज आक्रमक

रत्नागिरी:-  गेली अनेक वर्षे गो मातेचे पूजन, संगोपन आणि गोमातेचे महत्व सर्वांना समजावून देणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने गोवंश हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. येथे दोन दिवसांपूर्वी गोवंशाचे शीर आढळल्या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपीला शोधण्यासाठी सकल हिंदू समाजाने 48 तासांची मुदत दिली असून त्यानंतर आंदोलन केले जाणार आहे. या भूमिकेला विश्व हिंदू परिषदेने पाठिंबा दर्शवला आहे. यासंबंधीची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

व्यंकटेश हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री कुमार जोगळेकर, उपाध्यक्ष सौ. उमा देवळे, मातृशक्ती संयोजिका सौ. अस्मिता सरदेसाई बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विराज चव्हाण, गोरक्षा संयोजक विशाल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. जोगळेकर म्हणाले की, गो माता ही समस्त भारतीयांची माता आहे. तीच आपले पोषण करते. ती देवरूप आहे. त्यामुळे तिची हत्या आम्ही खपवून घेणार नाही. यापूर्वी पोलिसांना, जिल्हा प्रशासनाला हिंदुत्ववादी संघटनांनी गो हत्याविरोधात पावले उचलण्याबाबत निवेदने दिली आहेत. परंतु रत्नागिरी एमआयडीसी भागात घडलेल्या गो हत्या प्रकरणामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रत्नागिरीसारख्या शांत शहरात असे प्रकार निंदनीय असून प्रशासन, पोलिसांनी आरोपींना पकडून कठोर शिक्षा द्यावी.
विशाल पटेल म्हणाले की, गेले काही महिने रत्नागिरीत गोवंश हत्या घडण्याचे प्रकार आमच्या कानावर येत होते. परंतु एमआयडीसी भागात घडलेल्या दुःखद घटनेमुळे आम्ही सारे व्यथित झालो आहोत. आम्ही गो मातेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत. रत्नागिरीतून गो वंशाची तस्करी थांबवण्यासाठी नाक्यांवर तपासणी व्हावी, तसेच मुर्शी, साखरपा येथील नाक्यावर कडक तपासणी झाली पाहिजे. कारण तिथे अनेकदा अशा तस्करी थांबवण्याचे काम हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.

गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गो मातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्याकरिता विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज काम करेल. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे. परंतु ही जमिन महसूल खात्याकडे आहे, काही वाद प्रकरणे सुरू आहेत, असे उत्तर मिळाले आहे.