रत्नागिरी:- कनकादित्य मंदिर आणि नयनरम्य किनार्यावरुन सुर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी प्रसिध्द असलेले कशेळीत (ता. राजापूर) साहसी पर्यटकांसाठीचे मुख्य ठिकाण बनणार आहे. येथील किनार्यावर समुद्रामध्ये उभा असलेला साठ फुट उंच ‘सुळ्या’ हा उभाच्या उभा सुळका साहसी पर्यटकांना आव्हान देत आहे. हा अपरिचित ‘सुळ्या’ जिद्दी माउंटेनेरिंगच्या सदस्यांनी सर केला आहे.
सुर्यास्त दर्शनासाठी कशेळी ग्रामपंचायतीने किनार्यावर विकसित केलेल्या पर्यटन किनार्यापासून डोंगराच्या कडेने साधारण पाऊणतास चालत गेल्यावर समुद्राच्या पाण्यात वेढलेला ‘सुळया’ नावाचा 60 फुटाचा उंच सुळका आहे. याचा शोध स्थानिक ग्रामस्थ संदीप राडये यांनी घेतला होता. त्यांच्याकडून जिद्दी माउंटेनेरिंग संस्थेचे क्लायंबर अरविंद नवेले यांना माहिती मिळाली. अपरिचित असा हा सुळका सर करण्यासाठी जिद्दीच्या पथकाने रेकी केली. रविवारी (ता. 30) सकाळी जिद्दीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुळक्यावर चार ते पाच ठिकाणी रोप लावण्यासाठी दगडात बोल्ट, हँगर ड्रिलिंग करुन लावण्यात आले. दगडाला ड्रिल होत नसल्यामुळे आयत्यावेळी मोहीम थांबेल की काय अशी स्थिती होती. इलेक्ट्रीक हॅमर ड्रिल मशिन उपलब्ध होते; परंतु ते विजेवर चालवले जाते. अडचणींवर मात करत 1000 केव्हीचा एक जनरेटर सुळक्या जवळ नेण्यात आला. सकाळी 7 वाजता सुळक्यावरील चढाईसाठी पहिले पाऊल टाकले. समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा त्रास सहन करत जिद्दीची टिम सरसावू लागली. अरविंद नवेले यांनी नेतृत्त्व केले होते. जनरेटरच्या माध्यमातुन इलेक्ट्रीक ड्रिलने चढाईत दगडांना बोल्ट लावत या सुळक्याच्या माथ्यावर साधारण तिन तासाने अरविंद यांनी तिरंगा फडकवत सुळका सर केला. सुळक्याच्या माथ्यावर फक्त एकच व्यक्ती उभी राहू शकेल एवढीच जागा आहे. त्यामुळे एका वेळी एक जणच चढाई करून पुन्हा रॅपलिंग करत खाली येऊ शकतो. त्यानंतर दुस-या व्यक्तीला चढाई करता येते. नवेले यांच्यानंतर प्रसाद शिगवण, राकेश हर्डीकर, सतीश पटवर्धन, उमेश गोठीवरेकर, आकाश नाईक, वैभव कांबळे, आशिष शेवडे, ओंकार सागवेकर यांनी सुळक्यावर यशस्वी चाढाई केली. कोकणात पर्यटन वाढीसाठी मनापासून धडपडणारी जिद्दीच्या पथकात 21 ते 40 वयोगटातील तरुण आहेत. उमेश गोठीवरेकर हे एकावन्न वर्षीय एकमेव वरीष्ठ व्यक्ती आहेत. या मोहिमे दरम्यात स्थानिक हॉटेल व्यावसायीक संदीप राडये यांनी मदत केली.
कशेळीतील सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचवुन या गावातील पर्यटनाच्यादृष्टीने अशा ठिकाणांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यटन वाढीसाठीचा प्रामाणीक प्रयत्न जिद्दीच्या माध्यमातून केला जात आहे. – उमेश गोठीवरेकर, जिद्दी माऊंटेनिअरींग
सुर्यास्त पॉईटमुळे पर्यटनदृष्ट्या कशेळीला महत्त्व प्राप्त झाले आहे. परजिल्ह्यातून येणारा पर्यटक मुक्कामी राहील्यास रोजगार वाढेेल. त्यासाठी सुळ्यासारखी नवनवीन ठिकाणे पर्यटकांपर्यंत पोचवण्यात येत आहेत.– संदीप राडये, ग्रामस्थ