एजन्सीवरील कारवाईमुळे अस्पष्ट फोटो रिडिंगचे प्रमाण ४५ वरून ३ टक्क्यावर

रत्नागिरी:- अचूक मीटर रिडिंग न घेणाऱ्या एजन्सीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर चांगला परिणाम पुढे आला आहे. रीडिंग घेताना असणाऱ्या अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्के होते. या कारवाईमुळे हे प्रमाण आता अवघ्या ३ टक्क्यावर आले आहे. कोकण परिमंडळात हा सकारात्मक परिमाण झाला आहे. ग्राहकांना त्याचा फायदा होत असून अचूक बिल येत असल्याने तक्रारीचे प्रमाण कमी झाल्या आहेत.  

मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मुल्यांकन करत त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय महावितरणने घेतला. अस्पष्ट फोटोचे हे प्रमाण ४५ टक्के होते; मात्र आता कारवाईच्या बडग्याने हे प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मन:स्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान लक्षात घेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबवलेल्या विशेष प्रयत्नांमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील ३ महिन्यात (एप्रिल ते जून २०२२) वीजविक्रीतही तब्बल ३ (८२५ द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतूपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करत राज्यातील तब्बल ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी आमुलाग्र सुधारणा सुरू आहेत. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे; परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलिंगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. तसेच वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतूपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समजदेखील या एजन्सींजना देण्यात आली आहे.