रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये समुद्र किनारी असलेल्या ‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ला आज जिल्हा प्रशासनाने सील केले. सप्टेंबरमध्ये या रिसॉर्टचा करार संपल्याने ते सील केले आहे. पर्यटन वाढीच्यादृष्टीने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देता येईल का, याचा विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
भाट्ये समुद्रकिनारी आलिशान रत्नसागर बीच रिसॉर्ट उभारण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाट्येची ही शासकीय जागा करारावर घेऊन हे आलिशान रिसॉर्ट बांधले. छोट्या-छोट्या एसी, नॉन एसी रुम बांधल्याने देश-विदेशातील पर्यटकांनी त्याला चांगली पसंती दिली. पर्यटन वाढीला या रिसॉर्टचा चांगला फायदा झाला. मात्र स्थानिक ऑनलाईन बुकिंमुळे स्थानिक काम आणि बाहेरचे पर्यटक येथे अधिक येतात. प्रशस्त जागा असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक कार्यक्रम येथे होतात. या रिसॉर्टमुळे सुरवातीला स्थानिक पातळीवर काहीसा विरोध झाला होता. मात्र तो लगेच मावळला.
याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, रिसार्ट मालकाचा जिल्हा प्रशासनाच्या या जागेशी झालेला करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे रत्नसागर बीच रिसॉर्टला आम्ही सील केले आहे. मोठी जागा आणि तयार स्ट्रक्चर आहे. पर्यटनवाढीला त्याचा फायदा व्हावा, या अनुषंगाने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्याचा विचार आहे.