शिवसेना संपेल पण नाणार रिफायनरीचा विषय संपणार नाही

भाजप नेते प्रमोद जठार यांचा हल्लाबोल 

रत्नागिरी:-  राजापूर तालुका बार असोसिएशनने राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे रिफायनरीबाबत केलेली मागणी रास्त असून त्यांचे अभिनंदन केले पाहीजे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हा होणार आहेच. एकवेळ शिवसेना संपेल, पण रिफायनरीचा विषय संपणार नाही, असा विश्‍वास भाजपचे राज्य सचिव तथा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. ज्या दिवशी शिवसेना सत्तेतून उतरेल, त्याच्या दुसर्‍या दिवशी नाणार रिफायनरीची अधिसुचना काढली जाईल, हा माझा शब्द राहील असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

नाणार रिफायनरीबाबत राजापुर येथील स्थानिक संघटना आक्रमक होत आहे. त्यांना भाजपकडूनही पाठबळ मिळत आहे. भाजपचे पदाधिकारी प्रमोद जठार यांनी वारंवार रिफायनरीबाबत सकारात्मक भुमिका घेतली होती. रत्नागिरीत आलेल्या जठार यांनी राजापुरच्या बार असोसिएसिएशनने घेतलेल्या भुमिकेचे समर्थन केले आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या नाणार रिफायनरी विरोधी मतांवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, पक्षाचा पदाधिकारी म्हणूनच नव्हे तर कोकणवासीय म्हणून मी सातत्याने रिफायनरी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी रिफायनरीचा विषय संपला असे जाहीर केले होते. परंतु नाणार रिफायनरीचा विषय कधीच संपणार नाही. एकवेळ शिवसेना संपेल पण रिफायनरी होणारच. सध्याचे महाआघाडीचे सरकार पडेल त्याच्या दुसर्‍या दिवशी नाणारची अधिसुचना आम्ही काढून आणू. कोकणच्या विकासासाठी हा प्रकल्प कोकणाची गरज आहे.
सांमत यांना सल्ला देताना ते म्हणाले की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकलप संपला असे म्हणून बेरोजगारांची टिंगल करणे बंद करा. महाविकास आघाडीचे सरकार जाईल, तेव्हा नाणार होईल. सरकार केव्हा जाईल हे मी आताच सांगणार नाही. त्यासाठी थोडा धीर धरा. लवकरच ते घडेल.

ऑक्सीजन परत पाठवणे दुर्देवी रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना ऑक्सीजनचा टँकर माघारी पाठवत असतील हे रुग्णांचे दुर्दैव आहे. अनेक रुग्णांना आज व्हेंटीलेटरची गरज भासत आहे. कोल्हापूरमधूनही ऑक्सीजन मिळत नाही. त्यामुळे प्रशासन किती कुचकामी आहे ते दिसते, असा आरोप डॉ. विनय नातू यांनी केला. तर कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीच्या अहवालातील दिरंगाई डॉक्टरांमुळे होत आहे. गोव्यात आरटीपीसीआरचा अहवाल दोन तासात मिळतो. तो रत्नागिरीत का मिळू शकत नाही असा प्रश्‍न युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.