पांढरा समुद्र ते मिर्‍या धूपप्रतिबंधक बंधारा लवकरात लवकर पूर्ण करा: ना. सामंत

रत्नागिरी:- पांढरा समुद्र ते मिर्‍या मोरटेंभे हा महाराष्ट्रातील मोठा धूपप्रतिबंध बंधारा होणार आहे. या प्रकल्पाचे काम उत्तम गुणवत्तेसोबत जिल्हयाच्या निसर्ग सौंदर्यात व पर्यटन विकासात भर टाकणारे आहे. रोजगार निर्मिती करणारा आणि येथील पूर्ण भागाचे सरंक्षण करणारा प्रकल्प असल्याने तो लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

येथील अल्पबचत सभागृहात पांढरा समुद्र ते मिर्‍या मोरटेंभे होणार्‍या धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे प्रेझेंटेशन झाले. यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थ आणि संबधित अधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडया साळवी, सभापती बाबू म्हाप, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी, पतनचे कार्यकारी अभियंता एस.ए. हुनरेकर, सहाय्यक अभियंता एस. ए. चौधरी, मत्स्यविभागाचे देसाई आदी उपस्थित होते.
सादरीकरणामध्ये समुद्र किनार्‍यावरील धूप कशा प्रकारे कमी केली जाणार आहे. त्याबाबतच्या उपाययोजना, कामाचा तपशिल, काम कशा प्रकारे पूर्ण करण्यात येणार आहे, आदीची माहिती देण्यात आली. या सर्व बाबींवर येथील ग्रामस्थ, अधिकारी, कंन्सल्टंट यांच्यामध्ये चर्चा झाली. तसेच प्रस्ताव सीडब्लूपीआरएसला पाठविण्याचे ठरविण्यात आले.सामंत म्हणाले, मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधारा 3.5 किमीचा आहे. त्यासाठी 190 कोटी मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम उत्तम गुणवत्तेसोबत जिल्हयाच्या निसर्ग सौंदर्यात व पर्यटन विकासात भर टाकणारा आहे. या प्रकल्पाचे काम दिमाखदार झाले पाहिजे. या कामामध्ये लागणार्‍या वेगवेगळया परवानग्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. स्थानिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे येथील काम करत असताना स्थानिकाना विश्वासात घेऊन काम करावे. एकदा काम सुरु झाले की थांबणार नाही  याची दक्षताही आपण घेणे गरजेचे आहे. याचे टेंडर काढताना त्यामध्ये 7 वर्षाची लायबिलीटी राहणार अशी अट त्यामध्ये अंतर्भूत करा, अशी सूचनाही सामंत यांनी केली.