चिपळूण:- उद्धव सेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने दोन्ही गटाच्या भुवया उंचावल्या आहेत. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले. यापूर्वी पण त्यांनी विधानसभा, लोकसभेच्या प्रचारादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. पण सध्या ऑपेरशन टायगर सुरू असतानाच जाधवांची ही प्रतिक्रिया बुचकळ्यात टाकणारी आहे.
“बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची. बाळासाहेब मनोहर जोशींना सांगायचे या पोराला महाराष्ट्रात फिरवा. याला जर महाराष्ट्रात फिरवला तर तळागाळातला माणूस जोडला जाईल. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे पण क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला कधीही मिळाली नाही. माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवा आलं आहे.” चिपळूण येथे बोलताना त्यांनी मनातील सल बोलून दाखवली.
“माझ्याबद्दल उदय सामंत हल्ली खरोखरच चांगलं बोलत आहेत. उदय सामंत त्यांच्या मनामध्ये काय आहे मला माहित नाही. पण ते आदराने वागत आहेत. मी त्यांना असाच सांगेन तुमचा हा माझ्यापाठी आदर असाच कायम ठेवा”, या त्यांच्या वक्तव्याने उद्धव सेनेच्या भुवया उंचावल्या आहेत.
आम्हाला नवीन ताज्या दमाची फळी तयार करावी लागणार आहे. शिवसेनेचा वारस तपास केला तर शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे हेच आहेत. ज्या महसूल यंत्रणेने वारस तपास करायचा आहे ते यंत्रणात भ्रष्ट झाली आहे, खरी शिवसेना कोणाची यासंदर्भात यांनी असे भाष्य केले आहे.