रत्नागिरी:- जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची नवीन इमारत बांधकामे निकषात बसत नसल्याने प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. ही कामे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून घेण्यात आली हाेती. इमारतींची बांधकामे रद्द झाल्याने या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ज्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती माताेश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आखली होती. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती नादुरुस्त झाल्याने या ग्रामपंचायतींच्या इमारती नव्याने बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ४४ ग्रामपंचायतींची कार्यालये चकाचक करण्यासाठी नवीन इमारतींच्या कामांना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून मंजुरी दिली होती.
मात्र, त्यापैकी ३३ ग्रामपंचायतींच्या इमारतींची कामे निकषात बसत नसल्याने ती रद्द करण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याने त्यांची कामे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंजूर झालेल्या कामांपैकी २ ग्रामपंचायतींची कामे सुरू आहेत. तर कर्ला आणि मजगाव ग्रामपंचायतींच्या बांधकामांना जागेची अडचण निर्माण झाल्याने या इमारतींची कामे रखडली आहेत.