मत्स्य विभागाला मिळणार स्पीडबोट

रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच सागरी जिल्ह्यांमध्ये पाच अत्याधुनिक फायबर नौका तैनात होणार आहेत. त्या बोटी वेगवान असल्यामुळे अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल.

येत्या १ ऑगस्टपासून देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर यांत्रिकी मासेमारीला सुरवात होणार असून, या काळात कुठल्याही प्रकारची अनधिकृत मासेमारी होऊ नये याची दक्षता फायबर स्पीडबोटद्वारे घेतली जाणार आहे. यापूर्वी भाडेतत्त्वावर लाकडी नौका टॉलर्स गस्तीसाठी वापरण्यात येत असत; परंतु बदलत्या काळानुसार सरकारने अवैध मच्छीमारीला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व सागरी जिल्ह्यांमध्ये फायबर स्पीडबोट पुरवल्या आहेत. या स्पीडबोटीच्या आधारे अवैध मच्छीमारीवर नियंत्रण आणणे शक्य होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर मच्छीमारी होऊ नये म्हणून ही स्पीडबोट १ ऑगस्टपासून रूजू होईल. सध्या बंदी कालावधी असल्याने गस्तीनौका समुद्रात जात नाहीत. १ ऑगस्टपासून गस्तीनौकेचे कामकाज सुरू होईल, असे मत्स्यविभागाकडून सांगण्यात आले.