रत्नागिरी:- दरवर्षीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी सध्या शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर शेतीसाठीही उपयोग व्हावा यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी 15 किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती असून, त्यामुळे 12 हजार 690 सिंचन विहिरी बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतात. तसेच या योजनेंतर्गत विहिरींच्या कामासाठी 100 दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर तर अतिरिक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्यस्तरावर देण्यात येणार आहे. या योजनेमुळे खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणार्या उन्हाळ्यातही शेतीबरोबरच सिंचनासाठी शेतकर्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती आहेत.
त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 15 सिंचन विहिरी म्हणजेच 12 हजार 690 सिंचन विहिरींची खोदाई करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शेतीसाठी लागणार्या पाण्याची कमतरता भासणार नाही.
सिंचन विहिरीसाठी किमान 40 गुंठे जागा असावी. मात्र, 40 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर शेजारील सलग क्षेत्र घेऊन संयुक्त सिंचन विहीर बांधण्याचा लाभ शेतकर्यांना देण्यात येणार आहे.
वैयक्तिक सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी हॉल्टिकल्चर अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपवर नोंदणी करून शेताच्या बांधावरूनच शेतकरी सिंचन विहिरीची मागणी करू शकतात.