आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात जिल्ह्यातील 120 आरोग्य सेविका सहभागी

रत्नागिरी:- कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवारपासून आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांचे आंदोलन असून यामध्ये जिल्ह्यातील 120 आरोग्य सेविका सहभागी झाल्या आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनएचएम)मध्ये गेली अनेक वर्षे कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, औषध निर्माण अधिकारी इत्यादी संवर्गातील कंत्राटी पद्धतीने कर्मचारी प्रामाणिकपणे व तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. वारंवार या कर्मचार्यांना मानधन वाढ तसेच कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले. सध्या टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलन सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील आंदोलने जिल्हा परिषदेसमोर पार पडले आहे.

आता दुसरा टप्प्यातील आंदोलन मुंबई येथे सुरू झालं आहे. हे आंदोलन सोमवार व मंगळवार असे असणार आहे. हे या आंदोलनात जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचारी सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात सुप्रिया पाटकर, सेजल रसाळ, हर्षिता रसाळ, पुष्पा शेलार, प्रियांका भालेकर, प्रज्ञा कदम, विद्या गावडे, सायली शिवगण, सोनाली डोर्लेकर, दिपाली जाधव आदी सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरूच राहील, अशी माहिती अध्यक्ष सुप्रिया पाटकर व कार्याध्यक्ष सेजल रसाळ यांनी दिली.