रत्नागिरी:- ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित उतरावे यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ‘व्हॉलिंन्टीर रॅपिड डिझास्टर मॉनेटरिंग अॅण्ड मॅपिंग’ व्हीओआरडीएम ही यंत्रणा रत्नागिरी विमानतळावर बसवली जाणार असून त्यासाठी काही दिवसातच न्यूझीलँड येथून तंत्रज्ञ येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे याठिकाणी सद्यपरिस्थितीत इर्मजन्सीच्यावेळी नाईटलॅण्डींगही होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर वैमानिक धोका टाळण्यासाठी नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळांवर सुरक्षित विमाने उतरवित असतो. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते. अशा वेळी विमान उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी विमानतळावर ‘व्हॉलिंन्टीर रॅपिड डिझास्टर मॉनेटरिंग अॅण्ड मॅपिंग’ व्हीओआरडीएम ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरविता येणार आहे. ही एक अत्याधुनिक यंत्रणा असून ती रत्नागिरीत दाखल झाली असून ती बसवण्यासाठी न्यूझीलँड येथून तज्ज्ञ लवकरच रत्नागिरीत दाखल होणार आहेत.
या विमानतळासाठी नुकतीच 27 हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले असून आणखी 17 एकर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. येथील ग्रामस्थांनीही जागा देण्याची तयारी दाखवली आहे. रत्नागिरी येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणारी टर्मिनल बिल्डींगचे काम डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मुंबई विमानतळ प्राधिकरणाने याची तयारी पूर्ण केली आहे. महिनाभरात प्रवासी टॅक्सी वाहतुकीसाठी आवश्यक मार्गिकेचे कामही सुरु केले जाणार आहे. याठिकाणी सद्यस्थिती इर्मजन्सीला नाईट लँण्डींग होऊ शकते असे कोस्टगार्डच्या अधिकार्यांनी सांगितले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.