हायटेक बसस्थानकाचे काम पुन्हा रेंगाळले; एसटी प्रशासनाचा सुस्त कारभार

रत्नागिरी:- गेले अनेक वर्षे रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम वाढीव निधीमुळे रेंगाळलेले आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन हा वाढीव निधीचा प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेटकडे सादर करावा, अशी सूचना एसटी महामंडळाला केली आहे. गेल्या काही दिवसापासून रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम बंद स्थितीत असून य ाबाबत मात्र एसटी महामंडळ अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम सुरू असल्याचे एसटी महामंडळ इंजिनिअरिंग विभागाचे म्हणणे आहे प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी काम बंद असल्याचे सोमवारी दिसून आले. कोरोना नंतर बांधकाम साहित्य महागले असल्याने कामाचे बजेट वाढवून मिळावे, अशी मागणी ठेकेदाराने गेल्यावर्षीच केली होती, त्यानंतर सरकार बदलले आहे परिवहन मंत्रीही बदलले मात्र रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यामध्ये लक्ष घालून हा बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत बैठकाही घेतल्या आहेत, मुख्यमंत्री यांच्याशीही त्यांनी चर्चा केली असून वाढीव निधीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा वाढीव निधी प्रस्ताव कॅबिनेट कडे सादर करावा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या असून आठवड्यात तयार करून पाठवण्यात येणार आहे.
या बसस्थानकाचे काम बंद असून याबाबत महामंडळ चौकशी करून पाठपुरावा करू, आम्हाला तर काम सुरू असल्याची माहिती ठेकेदाराने दिली होती असे महामंडळ इंजिनिअरिंग विभागाकडून समोर आली.