कोकण किनारपट्टीचा धोका टळला; मिऱ्या, काळबादेवीतही प्रभाव
रत्नागिरी:- अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाची मोठी भरतीमुळे मिऱ्या, काळबादेवी, गणपतीपुळे आदी भागात मोठ मोठ्या लाटा उसळल्या होत्या.
किनारीभागात वाऱ्याचा वेगही वाढला होती. मात्र या उधाणाच्या भरतीचा तेवढा प्रभाव जाणवला नाही.
अरबी समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळ आणि आजच उधाणाची भरती असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मच्छीमांरांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने खबरदारी म्हणून याबात अलर्ट राहण्याचे आदेश सर्व विभागाला दिले होते. किनारी भागात सुमारे तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तविला होती. मात्र आज दुपारी बारा नंतर हळुहळु उधाणाच्या भरतीचा परिणाम दिसू लागला. मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर अजस्र लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. काळबादेवी किनाऱ्यावरही पाणी भरले होते. गणपतीपुळे किनाऱ्यावर या भरतीचा प्रभाव जाणवला. भरतीच्या लाटांचे पाणी गणेश मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन आदळत होते. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये ९ ते १० जूनला विजेचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ३०-४० किमी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता आहे.