रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील 1966 पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात मुंबईतील आझाद मैदानात सलग आठ दिवस आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका या महिलांनी घेतल्याने जिल्ह्यातील 378 उपकेंद्रांचा कारभार विस्कळीत झाला आहे.
मानधनात वाढ मिळावी, नेहमीत सेवेत कायम करावे, अंशकालीन नावात बदल करावे, रिक्त पदांवर वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेष व भाऊबिजेसाठी 2000 रुपये देण्यात यावेत, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन अदा करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे. गुरूवारीसुद्धा हे आंदोलन सुरूच राहणार आहे. यासाठी जिल्हाभरातून दीडशे महिला परिचर या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकांक्षा कांबळे, सुप्रिया पवार, संचिता घवाळी, जया तोडणकर, स्वराली आग्रे, श्रृतिका सावंत, नम्रता नार्वेकर, विनया कदम, कुंदा सिगम, आश्विनी यादव, मोहिनी सुर्वे, रेश्मा कांबळे, प्रमिला जाधव, विद्या पवार, मिनाक्षी मोहिनी, मनिषा नार्वेकर आदी उपस्थित होत्या. सलग आठव्या दिवशी हे आंदोलन सुरूच आहे. जिल्ह्यातील 378 आरोग्य उपकेंद्रांतील सर्वच महिला सहभागी झाल्याने कारभार विस्कळीत झाला आहे.