रत्नागिरीच्या नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचा होणार शुभारंभ
रत्नागिरी:- प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे रविवारी रत्नागिरीत येणार आहेत. या दोघा अभिनेत्यांसह पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीच्या नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रत्नागिरीतील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील विविध नद्यांचे गाळ काढण्यासाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये पावस गौतमी नदी करिता ७ लाख ६१ हजार ३०२, मजगाव नदी ७ लाख ५८ हजार ८३१ आणि पोमेंडी खुर्द महालक्ष्मीचा पऱ्या ९ लाख ६२ हजार २१४ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. नाम फाउंडेशन चिपळूण चिरणी मालदोली येथील जैवविविधता जोपासण्याचे ध्येय समोर ठेऊन तांत्रिकद्रुष्टीने परिपूर्ण गाळ काढण्याची पद्धत पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील तीन गावातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे.
या तिनही कामांचा रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पावस गणेश मंदिर येथे होणार आहे. सुप्रसिध्द अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर आणि मकरंदजी अनासपुरे यांच्या प्रुमुख उपस्थितीत पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जलसंपदा अधिक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदिश पाटील, यांत्रिकीचे कार्यकारी अभियंता जावेद काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता पावस गावच्या सरपंच चेतना सामंत, उपसरपंच शिंदे ,तसेच नामफाउंडेशनचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करित आहेत.