रेल्वे सहप्रवाशांना जाळून ठार मारणाऱ्या माथेफिरूला रत्नागिरीतून बेड्या

रत्नागिरी:- केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून वाद झाल्यानं एका माथेफिरून सहप्रवाशांनाच पेटवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाने ही मध्यरात्री ही कारवाई केली. रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून आरोपी शाहरुख सैफीला अटक करण्यात आली आहे. केरळमध्ये २ एप्रिल रोजी रेल्वेत त्याने आग लावली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता तर ९ जण जखमी झाले होते.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी शाहरुखचा शोध केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसकडून घेतला जात होता. त्याचे लोकेशन रत्नागिरीमध्ये आढळून आले होते. रत्नागिरीतल्या रुग्णालयात चौकशी केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा समजला होता.

केरळमध्ये ट्रेनमध्ये आग लावल्यानंतर खाली उतरताना त्याच्या डोक्याला जखम झाली होती. त्यावर उपचारासाठी तो रत्नागिरी रुग्णालयात दाखल झाला होता. उपचार घेण्यासाठी तो रत्नागिरी रुग्णालयात गेला. पण उपचार पूर्ण न घेताच त्याने रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर रत्नागिरीसह परिसरात केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने त्याचा कसून शोध घेतला. शाहरुख सैफीला रत्नागिरी स्टेशनवरून अटक करण्यात आली. सध्या आरोपी आरपीएफ रत्नागिरी यांच्या ताब्यात असून केरळ पोलिस त्याचा ताबा घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले आहेत.