उदय सामंत; २ वर्षे बंद असलेली योजना ३ महिन्यात सुरू
रत्नागिरी:- जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २५१ किमीच्या २०७ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांचा समावेश आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा क्र. ३ मधून २६५ किमींच्या रस्त्यांसाठी २०० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. अशा रितीने ३ महिन्यात जिल्ह्यात शिंदे-फडणवीस सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटीचा निधी दिला, अशी माहिती मंत्री उदय सामंत यानी दिली. दोन ते सव्वादोन वर्षे ही योजना काही लोक राबवू शकले नाही. हे पाप कोणाचे आहे, माहिती नाही; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राबवली, असा चिमटाही उद्योगमंत्र्यानी काढला. दूरदृश्यवाहिनीद्वारे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, तत्कालीन सरकारने २०१९ पासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम थांबले होते. ते काम सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या योजनेतून जिल्ह्यात २५१ किमी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मंडणगड १२.५ किमी, दापोली २६.२५ किमी, खेड २९ किमी, गुहागर २१, चिपळूण ३१, संगमेश्वर ३७, रत्नागिरी ३३, लांजा २६ आणि राजापूर तालुक्यात ३५.१६ किमीचे उद्दिष्ट आहे. २ वर्षानंतर समितीने या योजनेला मंजुरी दिली आहे. मंडणगड तालुक्यासाठी ९ कोटी, खेड १०, दापोली १९ कोटी, गुहागर १६.५० कोटी, चिपळूण २३.२५ कोटी, संगमेश्वर २५ कोटी, रत्नागिरी २५ कोटी, लांजा १८ कोटी, राजापूर २६ कोटी असा एकूण २०७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून टप्पा दोनमध्ये 2022-23 मध्ये ही कामे होणार आहेत. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ही योजना कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी डीपीसीतून पैसे दिले जाणार आहेत.
केंद्र शासनाची पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा ३ मध्येही शिथिलता आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २६५ किमीचेचे रस्ते घेतले जाणार आहेत. त्यासाठी २०० कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे ३ महिन्यात जिल्ह्यात शिंदे-फडणवीस ग्रामीण भागातील स्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटीचा निधी मिळणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील म्हणजे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचा विकास होणार आहेत. रत्नागिरी शहरासह अन्य रस्त्यांच्या कामालाही १०० कोटी नंतर मिळणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.