रत्नागिरी:- या वर्षीच्या खरीप हंगामात भाताच्या दरामध्ये अवघी 5.15 टक्के वाढ करून भात उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अशी कैफियत आता शेतकर्यांनी कृषी विभागाकडे मांडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भात हेच एकमेव पीक पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. या पिकासाठी मोठ्या प्रमाणात मजुरी खर्च येतो. मजुरीचे वाढलेले दर तसेच गेल्या काही महिन्यांत भात बियाणे, खते, अवजारे यांच्या दरात 30-40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असताना येणार्या खरीप हंगामातील भातपिकाचे दर केंद्र सरकारने अवघ्या 5.15 टक्क्यांनी वाढवल्याने भात उत्पादक शेतकरी नाराज आहे.
गतवर्षी भाताचा दर प्रति क्विंटलला 1 हजार 940 रुपये इतका होता. या दरात 5.15 टक्के वाढ करून हा दर 2 हजार 40 रुपये इतका करण्यात आला आहे. अन्य भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने भाताचे पीक वर्षभरात दोन वेळा घेतले जाते, त्या ठिकाणी यांत्रिकीकरणाचा अधिक वापर केला जात असल्याने उत्पादन खर्च कमी येतो. मात्र, कोकणातील भात उत्पादक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो आणि वर्षांतून एकदाच भाताचे उत्पादन घेतो. रत्नागिरीत 95 टक्के भातशेती अनिश्चित पावसावरच अवलंबून आहे. यांत्रिकीकरणाचा अभाव, पावसाचा लहरीपणा, वाढलेला मजुरी खर्च यामुळे येथील शेतकर्यांना भाताच्या उत्पादनासाठी प्रति क्विंटल 1 हजार 700 ते 1 हजार 800 इतका खर्च येतो. सरकारकडून सध्या प्रति क्विंटलचा दर 2 हजार 40 रुपये इतका देण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या महागाइच्या तुलनेत प्रत्येक क्विंटलमागे शेतकर्याला अल्प नफा होणार आहे.