जलप्रलयात मोबाईल यंत्रणा ठप्प; कामी आला सॅटेलाईट फोन

बचाव, मदतकार्याला झाला फायदा 

रत्नागिरी:- जिल्ह्यात जलप्रलयाने होत्याचे नव्हते केले. शेकडो वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शहर आणि गांवामध्ये पाणी भरले.जोडीला जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शहरे, गावांचा संपर्क तुटला तेव्हा मदतीला आला तो सॅटेलाईट फोन (इमर सेट) आणि पोलिस दलाची बिनतारी संदेश यंत्रणा म्हणजे वॉकीटॉकी.
 

दरड कोसळण्याची पोचरेतील दुर्घटना असो, पुरामध्ये गेलेली शहरे, गावं असो, या ठिकाणी तीन दिवस मदतकार्य, संपर्कांचा मुख्य दुवा या दोन यंत्रणा बनल्या. जेव्हा संपर्काचे सर्व पर्याय संपतात तेव्हा उपग्रहाद्वारे संपर्क होणाऱ्या सॅटेलाईट फोनचा उपयोग होतो. संरक्षण विभागाच्या परवानगीने या फोनचा वापर केला जातो. त्याचा रिचार्जदेखील महागडा आणि अर्ध्या लाखापर्यंतचा आहे. जिल्ह्यात २२, २३, २४ जुलैला आलेल्या जलप्रलयामध्ये प्रामुख्याने चिपळूण, खेड ही शहरे पाण्याखाली गेली. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. शहरे व गावांचा संपर्क तुटला. मदतकार्याला अनेक अडथळे येत होते. कोणाचा कोणाशी संपर्क होत नव्हता. पुरात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी प्रशासन, पोलिस, स्वयंसेवी संस्था, स्थानिक धावून आले; मात्र या दरम्याने दरडी कोसळण्याचे दुसरे संकट आले ते पोसरे, पेढे येथील  घरं मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेली.

एकापाठोपाठ एक संकटात संपर्क होत नसल्याने मदतकार्यात मोठे अडथळे येत होते. तेव्हा जिल्हाधिकारी  डॉ. बी. एन. पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सॅटेलाइट फोन सुरू करण्याच्या सूचना केल्या. यावरून गाझियाबाद येथून फोन रिचार्ज केल्यानंतर चिपळूण, पोचरे आणि पेढे या आपद्ग्रस्त भागात जिल्हा प्रशासनाचा उपग्रहाद्वारे थेट संपर्क सुरू झाला. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी त्यामुळे कायम संपर्कात होते. घटनास्थळी यंत्रणा पोचून बचाव आणि मदतकार्य सुरू झाले. सुरवातीला पोलिसदलाच्या वॉकीटॉकीचाही मोठा फायदा झाला. नियंत्रण कक्षातून चिपळूण, पोचरे, पेढे, खेड या ठिकाणी पोलिस दलाच्या या बिनतारी संदेश यंत्रणेमुळे मोठी मदत झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व अन्य अधिकारी तीन दिवस या यंत्रणेचा मदतीसाठी वापर करीत होते.