कोरोनाने हिरावला रंगपंचमीचा उत्साह; लाखोंची उलाढाल थंडावली

रत्नागिरी:- संपूर्ण जिल्हाभरात शुक्रवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. मात्र यावर्षीच्या रंगपंचमीवर कोरोनाचा मोठा प्रभाव दिसून आला.अत्यंत मर्यादित स्वरूपात बच्चे कंपनीसह मोठ्यांनी देखील रंगपंचमी साजरी केली. कोरोनामुळे बाजारात यावर्षी रंगांचे मर्यादित स्टॉल दिसून आले. दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल यावर्षी थंडावल्याचे दिसून आले. याचा व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला. 

रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्णपंचमीला येतो. रंगपंचमीनिमित्त बाजारपेठांमध्ये विविध आकारांच्या पिचकाऱ्या उपलब्ध असतात.   पिचकाऱ्यांसह निळा, पिवळा, लाल अशा विविध रंगांची विक्री होते. हर्बल कलर देखील मोठ्या प्रमानावर विकले जातात. विविध प्रकारच्या आणि आकर्षक पिचकाऱ्या लहान मुलांची मने जिंकतात. जनजागृतीमुळे नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरी करण्याकडेच अनेकांचा कल असल्याने मागील काही वर्षांपासून नैसर्गिक कलरची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत होती. 
 

मात्र यावर्षी रंगपंचमीसाठी दरवर्षीच्या तुलनेत केवळ 10 टक्केच उलाढाल झाल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. कोरोनाचा मोठा परिणाम रंगपंचमी सणावर आणि त्यानिमित्ताने खरेदीवर झाला. रत्नागिरी शहरात शुक्रवारी रंगपंचमी दिवशी वातावरण शांत असल्याचे दिसून आले. रस्त्यावर न उतरता काही ठिकाणच्या इमारतीमध्ये बच्चे कंपनी रंगपंचमी खेळताना दिसून आले. ग्रामीण भागात देखील हीच परिस्थिती होती.