वीज कोसळून राजापुरात महिलेसह मुलगी जखमी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील हातीवले आरेकरवाडी येथे वीज पडल्याने चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाल्याची घटना ताजी असताना रविवारी कोंडये तर्फ सौंदळ येथे घरावर वीज पडल्याने दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातीवले आरेकरवाडी परिसरात वीज पडल्याने चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये कोंडये तर्फ सौंदळ, बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याने घरात असलेल्या रविना लहू बेंद्रे (१७) व सारिका रघुनाथ बेंद्रे (४५) या जखमी झाल्या आहेत. या दोघींनीही उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वीज पडल्याने घरातील इलेक्ट्रिकल साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान याबाबतची माहिती मिळताच सरपंच मीनल तळवडेकर, शांताराम तळवडेकर, संतोष तळवडेकर, हेमंत उपळकर, विजय आगटे, अजित बेंद्रे, मंगेश बेंद्रे, प्रसाद मोहरकर, आशिष लाड, संदीप शिवगण, प्रशांत राऊत, तलाठी श्री.पिराई, ग्रामपंचायत शिपाई सूर्यकांत साळवी यांनी घटनास्थळी भेट दिली.