कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्याला राजाश्रयाची गरज 

रत्नागिरी:- गणेशोत्सव म्हटले की समोर येतो तो शक्ति-तुरा कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं… कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं… गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात. मात्र हा प्रकार  सणासुदीचे काळात पाहवयास मिळत असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या पारंपरिक नाचाला पारंपरिक पद्धतीला अनुदानाचा हातभार लावत ही कला जोपासण्यासाठी योजना आखणे गरजेचे बनले आहे. सध्या शक्ति-तुर्‍याचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे.

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शक्ती-तुरा हा नाच प्रसिद्ध आहे. कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गणगवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत्य करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात. कोकणच्या ग्रामीण भागात जाखडी नृत्याची परंपरा जपणारी घराणी आहेत. त्यांचेही नियम आणि मान ठरलेले आहेत. कोकणात काही घराण्याने गाणी रचतात. हल्ली या गाण्यांना नव्या चित्रपटातील गाण्यांची चाल लावली जाते. काळाच्या ओघात कोकणचा हा सांस्कृतिक ठेवा मागे पडतोय. नवी पिढी या लोककलेपासून दूर जातेय. काही भागात ही लोककला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतायत.

गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो. फेर धरून जाखडी नाचणार्‍या कलावंतांभोवती अख्खा गाव जमा होवून त्याचा आनंद घेत असतो. निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे जाखडी नृत्य. जाखडीमधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्याने केला जातो, म्हणून त्यास जाखडी असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो जखडणे. जाखडीमध्ये नृत्य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. काही ठिकाणी विशेषतः मंडणगड, दापोली या तालुक्यात जाखडी नृत्यास बाल्या नाच असेही म्हटले जाते. तर चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी शक्ति- तुरा असेही म्हटले जाते.

मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्या नृत्याला, बाल्या नाच असे नाव पडले. बाल्या अथवा जाखडी नृत्यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चेऊली नृत्यम असेही म्हणतात.
तर रत्नागिरी जिल्ह्याच्या शक्ति-तुर्‍याला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत आहे. त्या कला प्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलांपासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी कलगी या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला नागेशवळी म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी तुरेवाले या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्‍याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला.

पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे बाल्या. बाल्या, शक्ति-तुरा नृत्य श्रावणमास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते. नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सनई या वाद्यांचा वापर केला जातो. बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. यंदाच्या गणेशोत्सवात जाखडी नृत्याचा प्रभावात वाढ झाली असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.