पऱ्याच्या पाण्यात वाहून जाऊन प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवेंडी येथील भेळ्याचा पऱ्याच्या पाण्यात पडून धामणसे येथील प्रौढाचा मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनिल शिवराम रेवाळे (४५, रेवाळेवाडी-धामणसे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिल रेवाळे यांना मद्य प्राशनाचे व्यसन होते. मद्य प्राशनासाठी ते राजवाडी-निवेंडी येथील भेळ्याचा पऱ्या ओलांडून मालगुंड येथे गेले होते. त्याच वाटेने परत येत असताना पऱ्याला आलेल्या पाण्यात ते वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.