काळबादेवी, जयगड पुलांच्या मंजुरीने सागरी महामार्गाला गती

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेडी या सागरी महामार्गावर रत्नागिरीतील काळबादेवी आणि जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पुलाला हिरवा कंदिल मिळाल्यामुळे सागरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. रत्नागिरीतील या दोन पुलांबरोबरच सिंधुदुर्ग आणि रायगडमधील एका पुलाचा समावेश आहे.
कोकण किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेडी या सागरी महामार्गावर पूल उभारण्यासाठी एकूण चार पुलांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या.

काळबादेवी पूल रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी खाडीवर काळबादेवी बीच आणि सड्यामिर्‍याला जोडणार आहे. या पुलाच्या कामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड’ ही कंपनी पात्र ठरली आहे. काळबादेवीसाठी 291.64 कोटीचा खर्च अपेक्षित असून, हा पूल 2 लेनचा असून सुमारे 1.8 किमी लांबीचा आहे. कुणकेश्वर येथील पुलासाठी 158.69 कोटी खर्च अपेक्षित आहे.
या दोन पुलांबरोबर आणखी दोन अशा एकूण चार पुलांसाठी चार कंपन्यांनी 9 निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पूल 3.8 किमी लांबीचा आहे. रायगडमधील कुंडलिका खाडीवर रेवदंडा ते साळव खाडी पूल 4.4 किमी लांबीचा उभारण्यात येणार आहेत. आता निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पुलांच्या कामासाठी तीन वर्षाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.

सागरी महामार्गासाठी 9 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सागरी महामार्ग 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर 23 ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा महामार्ग कोकणातील किनार्‍यालगतच्या अरूंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातून रेवस येथून सागरी मार्गाची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेडी येथे शेवट होणार आहे.