कोकण पदवीधरसाठी जिल्ह्यात मतदाररसंख्या ४० टक्क्यांनी वाढली

रत्नागिरी:- कोकण पदवीधर मतदारसंघात मतदारांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. मागील निवडणुकीवेळी १६ हजार २२२ मतदार होते. ती संख्या २२ हजार ६८१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे असून, त्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून, अजून दोनवेळा त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोकण मतदारसंघात ७ जुलैला मुदत संपणार असून त्याकरिता ३१ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. अर्ज भरणे, छाननी, मागे घेणे या प्रक्रियेनंतर २६ जूनला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. १ जुलैला नेरूळ, नवी मुंबईतील आगरीकोळी संस्कृती भवन येथे मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांच्या सूचनेनुसार, ८०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र नियुक्त केले आहे. त्यामुळे मतदारांची गर्दी न होता सुरळीत मतदान होईल. मतदारांना मतपत्रिका देण्यात येणार असून, त्यांना प्राधान्यक्रमाने मतदान करावयाचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात स्त्री मतदार ९ हजार २२८ आणि पुरुष मतदार १३ हजार ४५३ आहेत.

मागीत निवडणुकीत २६ मतदान केंद्रे होती. आता ती ३८ करण्यात आली आहेत. मतदार केंद्रावर २५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी, कर्मचारी २५ जूनला अल्पबचत सभागृह येथून सर्व साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होतील. २६ जूनला सकाळी मतदान सुरू होईल. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मतपत्रिका व सर्व साहित्य सील करण्यात येईल. त्यानंतर सर्व गोपनीय साहित्य खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे एकत्रीकरण करून सुरक्षितरीत्या पनवेलला स्ट्राँगरूमला पोहोचवण्यात येणार आहेत. मतदानासाठी सुरक्षितता म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त, फिरते पथक व व्हिडिओ चित्रीकरण याद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी ३८ वाहने, भरारीपथके व तालुकानिहाय पथकांसाठी १८ वाहने, राखीव वाहने ९, मतपेट्या मतमोजणी केंद्रावर नेण्यासाठी मिनी ट्रकची व्यवस्था केली आहे.