रत्नागिरी शहरातील धोकादायक होर्डिंग हटवण्यास सुरुवात

रत्नागिरी:- मुंबईतील फलक दुर्घटनेनंतर रत्नागिरीतही धोकादायक फलकांची माहिती नगर पालिकेकडून घेतली जात असून, शनिवारी माळनाका एसटी स्टॉपजवळील म्हाडाचा धोकादायक फलक नगर पालिकेने हटवला.

माळनाका एसटी स्टॉपजवळ नगर पालिका व्यायामशाळेच्या जागेत म्हाडाचा जुना मोठा फलक होता. वडाच्या फांद्यामधून हा फलक फारसा दृष्टीस पडत नव्हता. परंतु त्याचे खांब व लोखंडी भाग सडू लागला होता. या बसथांब्यावर मोठ्याप्रमाणात विद्यार्थी बसेसची वाट पाहत थांबत असतात. त्यामुळे हा फलक पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, ही बाब दक्ष नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने याची माहिती नगर पालिकेचे प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांच्या कानावर घालण्यात आली. शनिवारी सुट्टी असतानाही त्यांनी व अन्य अधिकार्‍यांनी या फलकाची पाहणी केली. त्यानंतर त्यातील धोका ओळखत शनिवारी दुपारीच हा फलक जेसीबी व कटरच्या सहाय्याने पाडण्यात आला. यावेळी वडाच्या झाडाच्या फांद्यांचीही कटाई करण्यात आली. यासाठी काहीवेळ वाहतुकीतही बदल करण्यात आला होता.
नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी तुषार बाबर हे स्वत: भर पावसात हा फलक काढताना माळनाका थांब्यावर उभे राहून कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करीत होते.