शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील एक हजार पदे रिक्तच

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच ठरणार आहे. मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेने 996 शिक्षकांची भरती केली. ही भरती होऊनही जिल्ह्यात अद्याप 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एक शिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळा होऊ नये, याकरीता रिक्त पदांनुसार शाळांना एक एक शिक्षक देताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या संख्येने रिक्त झाल्यामुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी शाळा झाल्या होत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता 2023-24 या वर्षाकरीता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षक भरती झाली.
लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे ही शिक्षक भरती रखडली होती. मे महिन्यामध्ये अखेर या शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला. समुपदेशनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत 714 उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत 230 पदवीधर शिक्षक भरण्यात आले आणि उर्दूचे 58 शिक्षक भरण्यात आले. जिल्ह्यात 996 शिक्षकांची भरती होऊनही 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती होऊनही शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षकांचा गोधळ ग्रामीण भागात होणार आहे. सध्या जिल्हापरीषदेची कमान प्रशासनाकडे आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेणे शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे. अन्यथा पुन्हा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची एकूण रिक्त पदांची संख्या लक्षात घेता त्यानुसार भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक होते.


कोट

मागीलवेळी शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शासनाने मानधनावर नेमलेल्या शिक्षकांना पुन्हा अशा कमी शिक्षकी शाळांवर नियुक्ती देणे आवश्यक आहे. तरच शैक्षणीक गुणवत्ता व्यवस्थित राखणे शक्य होईल.

  • परशूराम कदम, माजी समाजकल्याण सभापती