बारावीच्या निकालात पुन्हा कोकण बोर्ड अव्वल! कोकण बोर्डाचा ९७.७१ टक्के निकाल

रत्नागिरी:- बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग बाराव्या वर्षी महाराष्ट्रात बाजी मारली आहे. फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय मंडळाचा निकाल राज्यात अव्वल म्हणजे ९७.५१ टक्के लागला आहे, माध्यमिकचे शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या अधिक मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव सुवर्णा सावंत यांनी दिली.

गतवर्षी मंडळाचा निकाल ९६.०१ टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळाचा निकाल १.५ टक्के एवढा जास्त लागला आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत झाली होती. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवला होता. शिवाय हे वेळापत्रक २ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना नकारात्मक विचार, परीक्षा भिती, मानसिक दडपण यातून बाहेर काढण्यासाठी मंडळ स्तरावर, जिल्हानिहाय समुपदेशक नेमले होते. तसेच नियमंण कक्ष, हेल्पलाईन सुविधा दिली होती. परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकेसुद्धा कार्यरत होती. खेळाडू, एनसीसी, स्काऊट, गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.

कोकण मंडळातून १२३९० मुलगे उत्तीर्ण झाले व मुली १२३६३ उत्तीर्ण झाल्या. मुलग्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४२ टक्के व त्यापेक्षा २.१८ टक्के जास्त मुलींचे प्रमाणे ९८.६० टक्के आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १५४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ अशा २४८ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुक्रमे ३८ व २३ अशी ६१ मुख्य परीक्षा केंद्रे होती. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ८०.३० टक्के लागला. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ६९० पैकी ५४२ विद्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२४ पैकी १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात रत्नागिरी जिल्ह्यात गैरमार्ग प्रकरणांची संख्या वाढली आहे. यंदा ९ प्रकरणे घडली व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही प्रकरण घडले नाही. गेल्या वर्षी रत्नागिरीत फक्त १ गैरमार्ग प्रकरण घडले होते. गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतिसाठी २२ मे ते ५ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून त्यासाठी शुल्क आकारणी केली जाईल.