जगबुडी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

तुंबाड येथील घटना, तिघांना वाचविण्यात यश

खेड:- खेड तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. तुंबाड येथे पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा यात बुडून मृत्यू झालाय. यातील तिघांना वाचविण्यात यश आलंय.

सौरभ हरिश्चंद्र नाचरे ( वय – १९, पन्हाळजे ), अंकेश संतोष भागणे (वय -२०, बहिरवली- मधली वाडी) अशी दोघा मृतांची नावं आहेत. आज दूपारनंतर सौरभ, अंकेश, यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड इथल्या जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते.

यादरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमीत्ताने नदीमध्ये उड्या मारल्या. नेमक भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही.

तिथेच एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तीघांना वाचवले. मात्र सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता. तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे – बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.