तांत्रिक अडचणीमुळे रत्नागिरीच्या समुद्रात अडकला ट्रॉलर

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या समुद्रात २० नॉटिकल मैलावर तांत्रिक बिघाडामुळे १ मच्छीमारी ट्रॉ़लर अडकला होता. स्थानिक मच्छीमार व तटरक्षक दलाच्या मदतीने रत्नागिरी मिऱ्याबंदर येथे त्याला सुखरूपपणे आणण्यात यश आल्याने ट्रॉलरवरील मच्छीमार आणि खलाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अचानक इंजिन बंद पडल्याने ट्रॉलर समुद्रात अडकला आणि त्यामुळे त्यांच्यावरील मच्छीमारांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने, वेळीच मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॉलर तामिळनाडू येथून मासेमारीसाठी रत्नागिरी समुद्रात आला होता. समुद्रात २० नॉटिकल अंतरात मासेमारी करत असताना या ट्रॉलरचे इंजिन अचानक बंद पडले.

त्यामुळे ट्रॉलर समुद्रात भरकटू लागला. त्यामुळे या ट्रॉलरवर काम करणाऱ्या चौदा मच्छीमारांचा जीव धोक्यात आला. दरम्यान, स्थानिक मच्छीमार व तटरक्षक दलाच्या ही बाब निदर्शनास आली. तटरक्षक दलाकडून व मच्छीमारांच्या साहाय्याने ट्रॉलरचा तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.