रत्नागिरीकरांवर भारनियमनाची टांगती तलवार

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 393 वीज ग्राहकांकडे 23 कोटी 88 लाखांची थकबाकीचा डोंगर महावितरणवर उभा ठाकला आहे. ही थकबाकी वेळेत वसूल न झाल्यास महावितरणच्या निकषानुसार रत्नागिरीतील वीज ग्राहकांना भारनियमनाच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार म्हणून पथदीप ग्राहकांची संख्या आहे. पथदीपची जिल्ह्यातील 1,690 स्थानिक स्वराज्य संस्थाकडे 6 कोटी 86 लाख रुपये थकबाकी आहे. महावितरणकडून ही थकबाकी भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही पाठपुरावा सुरू आहे. त्यापाठोपाठ 82,345 घरगुती ग्राहकांकडे 6 कोटी 50 लाखांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे.
महावितरणकडून फिडरनिहाय भारनियमन केले जाते. ज्या फिडरवर थकबाकीचे प्रमाण अधिक, विजेची चोरी, वीज गळती या निकषांच्या आधारे भारनियमन करण्यात येते. सध्या जिल्ह्यातही वीजचोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच वीजबिल न भरण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही वर्गवारीनुसार भारनियमन होण्याची शक्यता आहे.