पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना राष्ट्रपती पदक

रत्नागिरी:- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा बजावून सध्या ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. श्री.कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुळचे सांगली जिल्ह्यातील असलेले सुरेश कदम यांनी प्रशिक्षण कालावधीनंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून सेवेला सुरूवात केली. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर जयगड पोलीस स्थानकाच्या निर्मितीनंतर पोलीस उपनिरीक्षक असतानाही त्यांच्याकडे पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला होता. तेथेही त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून जिल्हा वाहतूक शाखा येथे थेट कार्यरत होते. त्यावेळी शहरातील वाहतुकीला त्यांनी शिस्त लावली होती.

पोलीस निरीक्षक म्हणून श्री.कदम यांनी नाटे, रत्नागिरी ग्रामीण येथे उत्कृष्ट सेवा केली होती. अनेक खून प्रकरणांमध्ये गुन्ह्याचा तपास योग्यरित्या करून आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने पुरावे गोळा करून श्री.कदम यांनी अनेक गुन्हेगारांना तुरूंगाची हवा दाखवली होती. पोलीस अधिकारी म्हणून शिस्तीचे पालन करत असतानाच पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत येणाऱ्या गावातील नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. केंद्र सरकारने त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित केले आहे. श्री.कदम यांची नुकतीच पालघर-वाडा येथून ठाणे येथे बदली झाली आहे.