अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात ना. सामंत यांनी मध्यस्ती करण्याची मागणी

रत्नागिरी:- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 50 दिवसांपासून संप सुरूच आहे, पण अजून शासनाकडून झालेल्या चर्चेनंतर ठोस प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे संपात धाडल्या जाणाऱ्या नोटीसांच्या त्रासाने अंगणवाडी सेविकांचे बळी जात आहेत. हे बळी रोखण्यासाठी आता राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी गांभिर्याने लक्ष घालावे अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तिवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, रिचार्जसाठी रक्कम मंजुर करणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे बेमुदत आंदोलन 4 डिसेंबरपासून सुरूच आहे. गेल्या 50 दिवस गावागावातील अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. अंगणवाडी कर्मचारी संपाची दखल अद्यापही शासन घेत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तिव्र नाराजी पसरलेली आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका सहभागी असल्याने त्याचा परिणाम अडीच हजार अंगणवाड्यांच्या कामकाजावर झालेला आहे. चिमुकल्यांचा किलबिलाट थांबला आहे. एकीकडे प्रचंड महागाई अन् दुसरीकडे तुटपुंजे मानधन, अशा कात्रीत अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका व मदतनीस सापडल्या आहेत. तुटपुंजे मानधन असल्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा , हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेकदा आंदोलने करूनही शासनाने दखल घेतलेली नसून आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
या संपामुळे 6 महिने ते 3 वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना आहार व आरोग्य, आहार व अनौपचारिक शिक्षण मिळत नाही. किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्याची सेवा मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी आहार, आरोग्यापासून वंचित आहेत. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा, पोषक आहार पुरविण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सुमारे 30 हजाराहून अधिक मुले अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे मोठी परवड सुरू आहे. याचा शासनाने विचार केला पाहिजे. अंगणवाडी कृती समितीच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री, सचिव व आयुक्त यांनी चर्चा केली. पण ठोस असा कोणताही पस्ताव आजपर्यंत दिलेला नसल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सौ. संजोक्ती शिंदे यांनी सांगितले. सुरू असलेला हा संप शासनस्तरावर सन्मानपूर्वक तडजोड होउन मिटावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा. अधिकारी व कृती समिती सदस्य यांच्याशी तडजोडीने बैठक घडवून आणावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. संज्योक्ती शिंदे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे भेटून केली आहे.