ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीकडून झाडाझडती

रत्नागिरी:- ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून गुरुवारी सकाळीच झाडाझडती सुरू करण्यात आली. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू असून आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेत.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “मी सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं. कारण मला हे अपेक्षित होतं. ज्या दिवशी मला ACB कडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं, त्याचदिवशी मला माहीत होतं, ही मंडळी माझ्या घरापर्यंत एक दिवस नक्की पोहोचणार, त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं. तसेच, त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे.”

मला अटक झाली तरी चालेल, मला चिंता नाही : राजन साळवी

मला अटक झाली तरी चालेल, अटक, जेल हे सर्व मला काही नवीन नाही आणि मी राजन साळवी काय आहे, हे मला स्वतःला माहिती आहे. माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, याचे परिणाम काहीही होऊ देत, सामोरं जाण्याची तयारी आहे, असंही ते म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आलेली. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर होत्या. तर, साळवी यांचे बंधू आणि पुतणे चौकशीला सामोरं गेलं होते.त्यावेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित होते. भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं.

राजन साळवींचं घर, हॉटेलचं एसीबीकडून मुल्यांकन

राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. यासर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबावापोटी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता.