जिल्ह्यात आढळल्या साडेतीन लाखाहून अधिक कुणबी समाजाच्या नोंदी

रत्नागिरी:-/जिल्ह्यात मराठा-कुणबी नोंदी तपासताना जुन्या दस्ताऐवजांमध्ये जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाखाहून अधिक कुणबी समाजाच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे यापुढे कुणबी दाखले देताना गरीब जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

तिल्लोरी कुणबी नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देताना ती प्रलंबित ठेवी जात असल्याबाबत कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जात पडताळणी समितीच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह अधिकारी वर्ग व कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तिलोरी कुणबी समाजाला कुणबी म्हणून दाखले दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरापासून मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी दस्ताऐवज तपासले जात असून, त्यात आतापर्यंत पंधरा लाखाहून अधिक दस्ताऐवज तपासण्यात आले आहेत. यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याचें 119 नोंदी आढळल्या असून कुणबी समाजाच्या तब्बल साडेतीन लाखाहून अधिक नोंदी आढळल्या आहेत. 1910पासून तपासण्यात आलेल्या जवळपास शंभर वर्षापूर्वीच्या दस्ताऐवजांमध्ये जिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक नोंदी कुणबी समाजाच्या आढळल्या आहेत. त्यामुळे या नोंदी विचारात घेऊन कुणबी समाजाला दाखले देताना आडकाठी करण्यात येऊ नये असे स्पष्ट मत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केले. कुणबी दाखल्यांसाठी गरीबांची फरफट होणार नाही याकडेही त्यांनी अधिकार्‍यांचे लक्ष वेधले.
यावेळी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले, रत्नागिरी अध्यक्ष रामभाऊ गराटे, रमेश सूद, सत्यवान कनेरी, तुकाराम मोंडे, विद्याधर गोठणकर, सुरेश बाईत, रमेश राणे, श्रीकांत राघव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.