गणपतीपुळे समुद्रकिनारी अतिक्रमणांवर होणार कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत गणपतीपुळे कार्यक्षेत्रातील सर्व्हे नंबर दोन समुद्रकिनारी व्यापार्‍यांचे अतिक्रमण वाढत आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत. यापुढे कधीही ग्रामपंचायत कारवाई करेल, अशा सूचना या नोटीसमधून देण्यात आली आहे.

येथील सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणार्‍यांना 23 नोव्हेंबर रोजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष भेट दिली. एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त असलेले व्यवसाय, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी कामगार असलेले व्यवसायधारक, ग्रामपंचायतीचा व्यवसाय कर थकवणारे व्यवसायधारक, फ्री झोनचे उल्लंघन करणार्‍या व्यवसाय धारकांवर ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार कारवाई दरम्यान संबंधित सूचनांचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसा किंवा रात्री केव्हाही कारवाई करण्यात येईल, अशाप्रकारची जाहीर नोटीस गणपतीपुळे समुद्रकिनारी ग्रामपंचायतीने लावली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी व इतर सार्वजनिक ठिकाणच्या सर्वच व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या एक-दोन वर्षापासून गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर असलेल्या सर्वच व्यवसायांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. तसेच व्यवसायांच्या ठिकाणी परप्रांतीय कामगारांचे प्रमाणही वाढल्याने स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. या ठिकाणी वाढलेले अतिक्रमण कमी व्हावे, या उद्देशाने गणपतीपुळे येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीला वारंवार कळविले होते. मात्र याबाबत कुठलीही कारवाई झालेली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील प्रमुख ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर वाढलेले अतिक्रमण कमी करावे, यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे जोर धरला
होता. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये संबंधित ग्रामस्थांनी लावून धरलेल्या मागणीचा विचार करून गणपतीपुळेच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी केली.