भरधाव चारचाकी वाहनाची तीन गाड्यांना धडक; गुरुवारी रात्री घडली घटना

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ येथे एका भरधाव चारचाकी मोटारीने तीन वाहनांना धडक दिली.यामध्ये जिल्हा न्यायालयाच्या गाडीसह अन्य २ गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. अपघात झाल्यावर तेथून धडक देणाऱ्यानी पोबारा केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सांगलीतील गाडी चालकाविरुद्ध शहर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीधर माणिक पाटील (रा. सुरूल , ता. वाळवा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित चालकाचे नाव आहे. साईराज राजकुमार शर्मा (वय २४, रा. आजगावकरवाडी जयस्तंभ) यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल सायंकाळी सव्वा सात वाजता शर्मा हे मित्र अनिल राठोड (रा. जयस्तंभ) यांच्यासोबत पालिकेसमोर उभे होते. एवढ्यात लाल रंगाच्या गाडीच्या (क्र. एमएच ४३-आर-९६१६) चालकाने गाडी जेलनाका ते चवंडे वठार, अशी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता चालवून शर्मा यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांची आई सारीका शर्मा यांच्या पायाला दुखापत झाली. दुचाकीला धडक दिल्यावरही भरधाव वेगात गाडी चालवून काळ्या रंगाची जीर (एमएच ०८-एक्स-०५६१) आणि जिल्हा न्यायालय असे लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला (एमएच ०८-एएक्स-४४८९) ठोकर दिली. या पद्धतीने ३ वाहनांन धडक देऊन एका महिलेला जखमी केले. तसेच वाहनांचे नुकसान करून संशयित पाटील तेथून पलायन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशय़िताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.