रत्नागिरीतील कोका-कोलाचे १० दिवसात भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ; ७०० कोटींची गुंतवणुक

रत्नागिरी:- लोटे (ता. खेड) एमआयडीसीमध्ये कोकाकोलाचा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामध्ये सुमारे ७०० कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राला उतरती कळा लागली असून, उद्योग बंद पडत आहेत. या परिस्थितीत जिल्ह्यात नवीन उद्योग येण्यास तयार आहेत. उद्योगमंत्री सामंत यांनी जहाजबांधणी करणारी भारती शिपयार्ड कंपनी नव्याने सुरू केली. वेरॉन कंपनीदेखील सुरू होण्याच्या मार्गावर आहे. एशिया कंपनीचा उच्च प्रतीचे टिश्यू बनवण्याचा मोठा प्रकल्प जिल्ह्यात येऊ घातला आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या १७५ एकर जागेमध्ये २४ नवीन उद्योग सुरू होत असून, २ हजार २५५ कोटीची गुंतवणूक प्रकल्पात झाली आहे. त्यातून सुमारे 4 हजार लोकांना रोजगार निर्मिती होईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग बंद असल्याचे चित्र दाखवले जाते; परंतु सुमारे २ हजार १४० उद्योगांपैकी फक्त २७६ उद्योग बंद आहेत. हे प्रमाण १० टक्केच आहे, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या प्रयत्नातून लोटे औद्योगिक वसाहतीत हिंदुस्थान कोका-कोला प्रकल्प होऊ घातला आहे. सुमारे ८८.९५९ एकरवर हा प्रकल्प होणार आहे. त्यासाठी कंपनीने ७०० कोटीची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने व्हावे यासाठी उद्योगमंत्री सामंत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच येत्या १० दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.