रत्नागिरी शहराला अखेर नियमित पाणी पुरवठा सुरू

रत्नागिरी:- बारा दिवसानंतर रत्नागिरी शहरवासियांना शीळ येथील नवीन जॅकवेलमधुन नियमित पाणीपुरवठ्याला प्रारंभ झालेला असताना सोमवारी पुन्हा विघ्न उभे ठाकले होते. पंपहाउस ते पाण्याची टाकी यांना जोडणार्‍या जलवाहिनीचा जॉईंट उडाल्याने न.प.प्रशासनाची धावपळ उडालेली होती. पण ती दुरूस्ती लागोलाग हाती घेत मार्गी लागून मंगळवारी सकाळी उशिराने नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले आहे.

गणेशोत्सवात रत्नागिरी शहरवासियांवर शीळ जॅकवेल कोसळल्याने ओढवलेले पाण्याचे संकट सोमवारी दूर झाले. शीळ येथे नवीन जॅकवेलच्या ठिकाणी जोडण्यात येणारी पाईपलाईन व पंपहाउसचे काम मार्गी लागताच त्यादिवशी पासून शहराला नियमित पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. साळवीस्टॉप येथील पाण्याची साठवण टाकी पुर्ण क्षमतेने भरण्यात आली. सोमवारी पुन्हा टाकी भरण्यात आली होती. त्यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू होण्याचे नियोजन करण्यात आले.

अशावेळी सोमवारी या सुरु झालेल्या पाणीपुरवठ्यात पुन्हा व्यत्यय आला होता. शीळ जॅकवेल येथे पंपहाउस ते पाण्याची टाकी दरम्यानची पाईपलाईनच जॉईंट उडाल्याने न.प.प्रशासन यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. ही समस्या मार्गी लावण्यासाठी यादिवशी सायंकाळी तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पाईपलाईनचा जॉईंट दुरूस्तीचे काम मार्गी लावण्यात येउन निर्माण झालेली समस्या मार्गी लागल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांनी धावपळ थांबली. त्यामुळे शहराला मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास थोडा उशिराने पाणीपुरवठा सुरू झाल्याचे सांगण्यात आले.