पडीक जमिनींवर हळद लागवडीसाठी सामंजस्य करार

रत्नागिरी:- कोकणातील पडिक जमीन आणि आंबा, काजूबागांमध्ये योग्य जमिनीवर हळदीची लागवड करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि मटकृषी अ‍ॅग्रोटेक ,मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार केला आहे. कोकण कृषी विद्यापीठ आणि खासगी संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर हळद पिकाची लागवड करण्यासाठी सार्वजनिक -खासगी सहकार्य तत्त्वावर राबवण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे.

विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे.
यामधून कोकणातील शेतकर्‍यांच्या जमिनीवर हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तयार झालेल्या हळदीवर प्रक्रिया करून त्यामधील कुरकुमिन काढणे, हळदीपासून पावडर तयार करणे, त्याचे उत्तमप्रकारे पॅकेजिंग करून विद्यापीठाचा एक स्वतंत्र निर्यातक्षम ब्रँड तयार करून विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार
आहे.
यासाठी वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रतिदिन दोन टन हळदीवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेचा कारखाना आणि हळदीची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यासाठी गोदामे बांधण्यात येणार आहेत. हळदीमधील कुरकुमिनची गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाही उभारण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा सर्व खर्चाचा भार मटकृषी प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

येत्या पाच ते सात वर्षात जवळजवळ 9 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी करणार असून, विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना हळदीच्या शास्त्रशुद्ध लागवडीचे प्रशिक्षण देणे, उत्तम दर्जाचे हळदीचे बियाणे व रोपे पुरवणे आणि शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात हळद लागवडीसाठी उद्युक्त करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.