रत्नागिरी विमानतळ भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वाकडे

रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पाच गटांचे रेकॉर्ड जुळत नव्हते. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाला घेऊन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी (ता. २५) वहिवाटदारांच्या मदतीने मोजणी केली. त्यामुळे आता विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तिवंडेवाडी व मिरजोळे येथील एकूण क्षेत्र 27.99.59 हे. आर. जागा संपादित करण्यात आली आहे. एकूण ६५ कोटीपैकी ५० कोटींचे वाटप झाले असून, १५ कोटींचे लवकरच वाटप होणार असल्याचेही प्रांताधिकारी जीवन देसाई त्यांनी सांगितले.

रत्नागिरी विमानतळ विकासासंदर्भात जमिनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता शासनाने दिली आहे. रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी विमानतळाच्या तिवंडेवाडी व मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथील एकूण क्षेत्र 27.99.59 हे. आर. संपादन करावयाचे येणार होते. त्या अनुषंगाने 4 ऑक्टोबर 2022 ला शासननिर्णयानुसार सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या रिझनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. हे विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. विमानतळाची सद्यःस्थितीतील धावपट्टी 1372 मी. (4500 फूट) लांबीची आहे. तथापि, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ Bombardier / ATR 72 प्रकारची विमाने वाहतुकीसाठी व इतर अनुषंगिक सेवा पुरवण्यास सक्षम व्हावे या दृष्टीने ही धावपट्टीची लांबी वाढवून ती 2135 मी. (7 हजार फूट) करण्याची मागणी तटरक्षक दलाने केली होती. या खेरीज, रत्नागिरी विमानतळावरून सुरक्षित नागरी विमान वाहतूक व्हावी यादृष्टीने आवश्यक त्या सुविधा (Parallel Taxi Track, Isolation Bay, Dispersal & other allied facilities) निर्माण व्हाव्यात यासाठी सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या धावपट्टीच्या पश्चिमेस मिरजोळे विमानतळ विकासासंदर्भात जमिनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता शासनाने दिली होती.