रिफायनरी विरोधातील आंदोलनासाठी राज्याबाहेरून फंडिंग तरीही बारसू रिफायनरी होणारच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत प्रतिपादन

मुंबई:- कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनासाठी बेंगळुरूमधून पैसा येत असल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. या प्रकल्पात गुंतवणूक करणारी आरामको कंपनी पाकिस्तानात गुंतवणूक करणार असल्याने आपल्या सरकारी कंपन्याच हा प्रकल्प पूर्ण करतील, अशी ग्वाही देत फडणवीस यांनी हा रिफायनरी प्रकल्प होणारच असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

काही ठराविक लोकांना देशाचा विकास नको आहे. तीच माणसे आरे कॉलनी, बुलेट ट्रेन आणि बारसूच्या विरोधातील आंदोलनात दिसतात. यातील काही माणसे नर्मदा धरणाच्या विरोधी आंदोलनात असल्याची नोंदही आढळली आहे. बंदी घातलेल्या ‘ग्रीन पीस’ या संघटनेच्या संपर्कात काही आंदोलक असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदीतील आरामको कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दुजोरा दिला. ‘बारसू प्रकल्पाला उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती ती पाकिस्तानात गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्या बारसूचा रिफायनरी प्रकल्प पूर्ण करतील. मात्र स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल’, अशी ग्वाही फडणवीस यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना दिली. बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.

‘बारसू प्रकल्पविरोधकांची संख्या अत्यल्प असून, त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. या प्रकल्पासाठी आपल्याला जबरदस्ती करायची नाही. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. तेथील कातळशिल्पांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या हिताला आणि पुढील दोन दशके राज्याच्या विकासाला चालना मिळेल. अशा गोष्टींना विरोध करणे योग्य नाही’, असे फडणवीस म्हणाले.